सोमेंद्र शर्मा/मुंबई
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड, उद्योगपती अनिल अंबानी आणि काही अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) ३ हजार ७५० कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एलआयसीचे प्रादेशिक व्यवस्थापक एम. के. तेजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
पैशाचा केला अपहार
कंपनीने आपल्या उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी वळवला, बोगस बिले तयार केली आणि शेल कंपन्यांच्या मदतीने पैशांची अफरातफर केली. मालमत्ता आणि शुल्कामध्ये मोठी तफावत असल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सवर या आधीही विविध बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले आहेत. दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे.