भाईंदर : विरार ते दादर दरम्यान धावणाऱ्या १५ डब्यांच्या जलद लोकलने भाईंदर स्थानकात नियोजित थांबा न घेतल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित लोकल चालक (मोटरमन) यांना निलंबित करण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली आहे.
सदर लोकलने भाईंदर स्थानकात थांबा न घेता पुढे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जाऊन थांबा घेतल्याने स्थानकावर प्रवासासाठी तयार असलेल्या चाकरमान्यांचा गोंधळ उडाला. परिणामी अनेक प्रवाशांना पायपीट करत भाईंदर स्थानक गाठावे लागले.
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेमध्ये अशा प्रकारच्या घटनांचा थेट परिणाम प्रवाशांच्या दैनंदिन वेळापत्रकावर होतो. त्यामुळे मोटरमनच्या निलंबनाची कारवाई तत्काळ करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती नेमली असून पुढील तपास सुरू आहे.