मुंबई : मुंबई महापालिकेच्या विशेष समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजप व शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून विरोधी पक्षांकडून अर्ज दाखल न झाल्याने विशेष समिती अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया बिनविरोध होणार आहे. स्थापत्य शहर अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी जाधव तर उपाध्यक्षपदी भाजपचे अजय पाटील बिनविरोध निवडले जाणार आहेत.स्थापत्य उपनगर अध्यक्षपदी संगीता शर्मा आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुरेश आवळे यांची निवड नक्की झाली आहे. विधी समिती अध्यक्षपदी दिक्षा कारकर आणि उपाध्यक्षपदी भाजपचे अनिश मकवाणी निवडून येणार आहेत.
महिला बालकल्याण समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या मीनल तुर्डे यांचा तर तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या रिटा मकवाना यांचाच अर्ज प्राप्त झाला आहे. बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या हेतल गाला यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे भास्कर शेट्टी हे निवडून येणे नक्की झाले आहे.
आरोग्य समिती अध्यक्षपदी भाजपचे हरीश भांदिर्गे आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे रितेश राय हे निवडून येणार आहेत. आता या सर्व उमेदवारांच्या विरोधात कोणतेही अर्ज न आल्याने निवडणुकीच्या दिवशी ते निवडून आल्याची औपचारिक घोषणा होणे तेवढे बाकी आहे.
विरोधकांची नाचक्की
मुंबई महापालिकेच्या सहा विशेष समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांनी एकही उमेदवार उभा न केल्याने सत्ताधारी शिवसेना - भाजप पक्षाच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्गच मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत विरोधी पक्षाने एकही उमेदवार न दिल्याने विरोधकांची चांगलीच नाचक्की झाली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
चुकीची स्वाक्षरीः नोटीस बजावणार
मुंबई महापालिकेतील गेली २५ वर्षे सत्तेचा उपभोग घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता गेली. तरीही ६५ नगरसेवक निवडून आल्याने विरोधकांच्या बाकावर बसण्याचा मान मिळाला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या टी व एस प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने स्वाक्षरी केल्याने प्रभाग समितीवर पाणी सोडावे लागले. अखेर चुकीला माफी नाही याचा दाखला देत संबंधित दोन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून मातोश्री निवासस्थानी हजेरी घेण्यात येणार असल्याचे ठाकरे सेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले. मुंबई महापालिकेत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता स्थापन झाली असून प्रभाग समितीवर भाजप व शिंदे सेनेचा वरचष्मा राहिला आहे. १७ पैकी ९ प्रभाग समितीवर भाजपचे कमळ फुलले आहे. तर दोन समित्यांवर एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मात्र गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेचा उपभोग घेणाऱ्या उद्धव ठाकरे सेनेला प्रभाग समितीवर वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. त्यात टी व एस प्रभाग समितीच्या निवडणुकीत चुकीच्या रकान्यात स्वाक्षरी केल्याने प्रभाग समिती हातून निसटली आहे. दरम्यान, या प्रकारा बदल संबंधित दोन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.