मुंबई : कर्तव्य बजावताना कोरोनाची लक्षणे असूनही केवळ ‘आरटीपीसीआर’ चाचणी झाली नाही, या तांत्रिक कारणास्तव बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे नाकारणे, तसेच कर्मचाऱ्याच्या वारसाला मदतीपासून वंचित ठेवणे अमानवीय आहे, असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला दणका दिला. बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्याच्या वारसाला ५० लाख रुपयांची सानुग्रह मदत आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरीही द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
नयन वसंत लाकेश्री हे बेस्ट प्रशासनामध्ये बस वाहक (कंडक्टर) म्हणून कार्यरत होते. ४ जून २०२० रोजी कर्तव्यावर असताना त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांना तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ६ जून २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने मृत्यूचे संभाव्य कारण 'कोरोना संशयित' आणि 'हृदयविकाराचा झटका' असे नमूद केले होते. परंतु, त्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी झाली नसल्याचे कारण पुढे करत बेस्ट प्रशासनाने त्यांचा मुलगा सुबोध लाकेश्रीला अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठीचा अर्ज फेटाळला होता. प्रशासनाच्या भूमिकेला सुबोधने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
शक्यतांची प्रबळता लक्षात घ्या...
याचिकेवर न्यायमूर्ती आर. आय. छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. अशा प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण सिद्ध करण्यासाठी 'शंकेपलीकडील पुरावा' न पाहता 'शक्यतांची प्रबळता' लक्षात घेतली पाहिजे, असे खंडपीठाने निर्णय देताना म्हटले.