मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर सध्या चालवण्यात येत असलेल्या वातानुकूलित लोकलच्या संख्येत आणखी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवार, २९ जूनपासून मुख्य मार्गावर १२ विना-वातानुकूलित उपनगरीय सेवांचे वातानुकूलित सेवांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वातानुकूलित सेवांची संख्या १२० होणार आहे. यामुळे विना-वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिकच कठीण होणार आहे.
वातानुकूलित प्रवाशांकडून लोकल सेवांमध्ये वाढ करण्याची मागणी होत असल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून वातानुकूलित लोकलच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. सध्याच्या विना-वातानुकूलित सेवांच्या जागी या सेवा कार्यान्वित केल्या जाणार आहेत. यामध्ये गर्दीच्या वेळेतील लोकलही वातानुकूलित झाल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होणार आहे. या बदलामुळे मध्य रेल्वेवरील एकूण वातानुकूलित उपनगरीय सेवांची संख्या १२० पर्यंत वाढणार आहे. सध्या हार्बर मार्गावर २८ आणि मुख्य मार्गावर ९२ सेवा चालवण्यात येत आहेत.