मुंबई

सीएसएमटी स्थानकात मृत उंदरांची दुर्गंधी; कर्मचारी-प्रवासी हैराण, पाच दिवसांत सुमारे १५० मृत उंदीर

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुख्य इमारतीच्या परिसरात गेले काही दिवसांपासून मृत उंदरांच्या दुर्गंधीने कर्मचारी आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुख्य इमारतीच्या परिसरात गेले काही दिवसांपासून मृत उंदरांच्या दुर्गंधीने कर्मचारी आणि प्रवासी हैराण झाले आहेत. कर्मचारी दालन आणि मुख्य इमारत परिसरात दुर्गंधी येत असल्याने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव यांनी कर्मचारी दालन व इतर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यालये आणि परिसरात तातडीने स्वच्छतेची कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मृत उंदरांच्या दुर्गंधीमुळे गेल्या पाच दिवसांपासून मोटरमन आणि लोकल व्यवस्थापक दालनाबाहेर बसले आहेत. कर्मचाऱ्यांचे दालन आणि इतर कार्यालयाचे सिलिंग तोडून सुमारे १५० मृत उंदीर मिळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर २५ हून अधिक जिवंत उंदीर आढळले आहेत. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोटरमन आणि लोकल व्यवस्थापक यांच्या दालनातून सुमारे ४०० मोटरमन आणि सुमारे ३०० लोकल व्यवस्थापक कर्तव्य बजावतात. २२ जुलै पासून मोटरमन आणि लोकल व्यवस्थापक मृत उंदरांच्या दुर्गंधीने त्रस्त आहेत. दुर्गंधीने हैराण झालेल्या कर्मचाऱ्यांनी अखेर सीएसएमटी स्थानकात दालनाबाहेर खुर्च्या-टेबल टाकले आहेत. याठिकाणाहून हे कर्मचारी नियमित काम करत आहेत. मोटरमन आणि लोकल व्यवस्थापक यांच्या तक्रारीनंतर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत १८ ते २० मृत उंदीर आढळून आले. २४ जुलै रोजीही कर्मचाऱ्यांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. तर २६ जुलै रोजी कर्मचारी दालनाच्या आजूबाजूच्या कार्यालयातील छत तोडून मृत उंदरांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे अखेर शुक्रवारी व्यवस्थापक राम यादव यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

पाच दिवसांत सुमारे १५० मृत उंदीर

गेल्या पाच दिवसांत सुमारे १५० मृत उंदीर आढळले असून, त्यामध्ये २५ उंदीर जिवंत सापडले. दालनात स्वच्छता योग्य होत नसल्याचा हा परिणाम आहे. औषधाचा वापर करण्यात आल्याने एवढे मृत उंदीर आढळले, असे सूत्रांनी सांगितले.

साफसफाई करणाऱ्या संस्थेला दंड

आजपर्यंत ९४ हून अधिक मृत उंदीर आढळले आहेत. याप्रकरणी साफसफाई करणाऱ्या संस्थेला पाच लाखांचा दंड ठोठावला असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक