मुंबई

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video

मुंबईतील दादर येथील प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बसचे नियंत्रण सुटले आणि बसने एकामागोमाग एक वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

Mayuri Gawade

दादरमधील प्लाझा सिनेमाजवळ सोमवारी (दि. ८) सकाळी भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बसचे नियंत्रण सुटले आणि बसने एकामागोमाग एक वाहनांना धडक दिली. यात अ‍ॅक्टिव्हा, इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी, बलेनो कार आणि एका इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. त्यानंतर बस रस्त्यालगत सुरू असलेल्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्सवर आदळली आणि पुढे जाऊन खोदकामासाठी उभ्या असलेल्या जेसीबीवर धडकली.

अपघाताची तीव्रता इतकी होती की जेसीबीचा काही भाग बसच्या पुढील काचेत घुसल्याचे दिसून आले. घटनास्थळावरील व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये टॅक्सी उलटलेली आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

सायन रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. रणधीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यातील २२ ते २५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात तरुणाला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. ऋषभ गुप्ता (वय अंदाजे २५ ते ३०) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. बेस्टचे कंडक्टर सतीश वाघांबरे (४८) यांच्या छाती आणि कंबरेला दुखापत झाली आहे, तर महेश डोईफोडे (५०) यांच्या डाव्या खांद्याला मार लागला आहे.

वाहतुकीवर परिणाम

अपघातानंतर कोतवाल गार्डन परिसरात वाहतूक संथ झाली होती. मुंबई वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

अपघातानंतर बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.

Mumbai : मालाडवासीयांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम; वायफाय आधारित आधुनिक कॅमेऱ्यांची नजर, पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ठरणार उपयुक्त

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

तीन वर्षीय विधी CET प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार