मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नागरिकांची अनिर्णित प्रकरणे, कागदपत्र तपासणी पूर्ण करून लवकरच पात्रता प्रक्रिया अंतिम केली जाणार आहे. धारावीचा मास्टर प्लॅन सरकारकडे पाठविण्यात आला असून तो लवकरच मंजूर केला जाईल, असा विश्वास ‘एसआरए’चे सचिव विपीन पालिवाल यांनी व्यक्त केला.
धारावीतील म्हाडा वसाहतीमध्ये सेक्टर ४ आणि सेक्टर ५ साठी विशेष शिबिराला पालिवाल यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी पालिवाल यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, धारावीतील पाच सेक्टरमध्ये विशेष शिबिर घेण्यात येत आहे. कागदपत्रे जमा न केलेले, सर्वेमध्ये सहभागी न झालेल्या लोकांची प्रकरणे अनिर्णित राहिली होती. अशा झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करण्यासाठी ही शिबिरे घेण्यात येत आहेत. गुरूवारी जवळपास साडेचार हजाराहून अधिक झोपडीधारकांनी शिबिराला भेट दिली असून त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले असल्याचे पालिवाल यांनी सांगितले.
भविष्यात देखील नागरिकांच्या मागणीनुसार शिबिरे आयोजित करण्यात येतील. ज्या नागरिकांनी अद्याप कागदपत्रे दिली नाहीत. सर्वे करून घेतला नाही, अशा नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.