भाईंंदर : मेट्रोच्या टप्प्या क्रमांक ९ मधील दहिसर ते काशिगाव या मार्गिकेवर यावर्षीच्या अखेरीस मेट्रो धावणार, त्यामुळे मीरा-भाईंदरकरांचे आणखी एक स्वप्न लवकरच पूर्ण होईल! असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यासोबत मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मासह महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, सन २००९ पासून मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदा मेट्रो -९ मार्गिकेला परवानगी मिळाली. या अंतर्गत येणाऱ्या दहिसर ते काशिगाव या मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, येत्या ६ महिन्यांत हे काम पूर्ण होईल आणि मीरा-भाईंदरवासीयांसाठी मेट्रोचे स्वप्न सत्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. या पाहणीदरम्यान त्यांनी काशिगाव स्थानकाचा प्लॅटफॉर्म व कॉनकोस लेवलच्या स्थापत्य कामाची माहिती घेतली. प्रकल्पाचे ९५% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे १५ नोव्हेंबर पूर्वी करून घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तांत्रिक पाहणी लवकरच
मेट्रो टप्पा क्रमांक -९ अंतर्गत येणाऱ्या दहिसर ते काशिगाव या मेट्रो मार्गाचे तांत्रिक पाहणी व ट्रायल रन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांना करण्यात आली असून लवकरच या मार्गाची तांत्रिक पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकरात लवकर करावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी उपस्थित असलेल्या मेट्रोचे अधिकाऱ्यांना दिल्या.