मुंबई : भायखळा येथील एका बिल्डरचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी दहा कोटीची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाचही आरोपींना किल्ला कोर्टाने १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इलियास बचकाना, वाजिद खान, करीम खान, आलमगीर मलिक अशी या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यांचा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. माझगावचे रहिवाशी असलेल्या एका २३ वर्षांच्या बिल्डरचे गुरुवारी २३ नोव्हेंबरला अपहरण करण्यात आले होते. एका कारमधून कोंबून त्यांना मानखुर्द येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या अपहरणाची माहिती देऊन त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी दहा कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गुन्हे शाखेच्या दोन पथकाने इलियास बचकानासह त्याच्या चार सहकाऱ्यांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती.