मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो-३ अर्थात ॲक्वा लाईनची सेवा १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना भेट देऊन उशिरा परतणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्यरात्रीपर्यंत धावणार मेट्रो
सध्या कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या दोन्ही टर्मिनसवरून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात या वेळेत ९० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. आता दोन्ही टर्मिनसवरून शेवटची मेट्रो रात्री १२ वाजता सुटणार आहे.
गणपती मंडळांपर्यंत पोहोचणे होणार सोपे
ॲक्वा लाइनमुळे सिद्धिविनायक, दादर, वरळी, महालक्ष्मी आणि गिरगाव परिसरातील अनेक प्रसिद्ध गणपती मंडळांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळून भाविकांना मेट्रोने जलद आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
१८ इंचांपर्यंतच्या गणेशमूर्तींना परवानगी
गणेशभक्तांच्या सोयीसाठी ॲक्वा लाइन मेट्रोमध्ये १८ इंच (४५ सेंटीमीटर) उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी मेट्रो प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
भाविकांना मेट्रोचा लाभ घेण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात वाढीव मेट्रो सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन MMRCकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा, यासाठी ही विशेष सुविधा देण्यात आली आहे.