मुंबई : रेल्वे रूळ ओलांडताना धडक बसून झालेला मृत्यू अनुचित घटना मानली जाऊ शकत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. प्रवाशाने रेल्वे रूळ ओलांडण्याची चूक केलेली असते. अशा स्थितीत प्रवासी भरपाईचा दावा करू शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
५ ऑगस्ट २००६ रोजी एका रेल्वे प्रवाशाचा नालासोपारा आणि भाईंदर दरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्या मृत प्रवाशाची पत्नी सिंधू देवानंद शिवदास यांनी रेल्वेकडे नुकसानभरपाईसाठी दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, पती चालत्या गाडीतून पडल्यामुळे हा अपघात झाला होता. त्यांच्या या दाव्यावर रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला होता. त्याच आधारे रेल्वे दावा न्यायाधिकरणाने मृत व्यक्तीच्या पत्नीला नुकसान भरपाई नाकारली होती.
न्यायाधीकरणाच्या निर्णयाला आव्हान देत मृत प्रवाशाच्या पत्नीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली आणि निर्णय दिला. अपघातानंतर प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये केईएम दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सोबत असलेल्या मित्राने मृत प्रवाशाला रेल्वे रूळ ओलांडताना मागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने दुखापत झाल्याचे सांगितले. न्यायालयाने जबाब ग्राह्य धरत रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू होणे ही अनुचित घटना नसल्याचे निरीक्षण नोंदवले.