मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या जळीत रुग्ण उपचार केंद्राचे लोकार्पण शैलेश लिमडी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. केईएम रुग्णालयातील या केंद्रामध्ये जळीत रुग्णांसाठी अद्ययावत अशी उपचार सुविधा महिला, बालकांसह आता पुरुष रुग्णांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्षापोटी १५० ते १७० रुग्णांवर उपचार करण्याची या केंद्राची क्षमता आहे.
कार्यक्रमासाठी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सुघटन शल्यचिकित्सा (प्लास्टिक सर्जरी) विभागाच्या प्रमुख डॉ. विनीता पुरी तसेच केईएम रुग्णालयाचे विविध विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
भाजलेल्या / जळीत रुग्णांना तत्काळ आणि वेळीच योग्य उपचार देण्याच्या दृष्टीने अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. अशा रुग्णांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी दिल्या होत्या.
शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट असल्याचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी सांगितले.
नूतनीकरण करण्यात आलेल्या जळीत रुग्ण उपचार केंद्रात एकूण १२ रुग्णशय्या सर्व सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या केंद्रात संपूर्ण सुविधांनी परिपूर्ण अशा अतिदक्षता उपचार कक्षांचा समावेश आहे. कक्षामध्ये व्हेंटिलेटर, मल्टीपॅरॅमीटर मॉनिटर, अद्ययावत सेवांचा समावेश आहे. डायलिसीस मशीनचाही समावेश करण्यात आला आहे. या अद्ययावत उपकरणांमुळे भाजलेल्या / जळीत रुग्णांच्या उपचारांदरम्यान निर्माण होणाऱया गुंतागुंतीवर अधिक प्रभावीपणे उपचार करणे शक्य होणार आहे.
कक्षामध्ये अद्ययावत फर्निचर उपलब्ध करून देतानाच उत्तम प्रकाश व्यवस्था राहील यावर भर देण्यात आला आहे. जळीत रुग्णांच्या उपचार जखमांवर करतानाच होणा-या वेदनांपासून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने टेलिव्हिजन संच लावण्यात आले आहेत. कक्षामध्ये समर्पक पद्धतीचा उपचार कक्ष निर्माण करण्यात आला असून रुग्णांवर तत्काळ उपचार होतील यासाठी विभाग कार्यरत असणार आहे. रुग्णांना संसर्गाचा होणारा धोका टाळण्याच्या अनुषंगाने कक्षातील प्रवेश नियंत्रित ठेवतानाच रुग्णांची ने-आण सुलभहोईल, अशी रचना करण्यात आली आहे. रुग्णांच्या सुरक्षितता आणि काळजी यासाठीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. संगीता रावत यांनी दिली.
भाजलेल्या / जळीत रुग्णांना होणारी जखम ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर वैद्यकीयदृष्ट्या, भावनिक तसेच सामाजिकदृष्ट्या आघात करणारी बाब असते. अशा रुग्णांना उपचारासह आधार व आशा देण्याची जबाबदारी या केंद्राची आहे. रुग्णांना उपचारासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करतानाच सन्मानपूर्वक वागणूक देण्याची केंद्राची महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी आहे. रुग्णांच्या प्रति अतिशय कार्यक्षम, सुरक्षित आणि मानवीय दृष्टिकोनातून सेवा देण्यासाठी आमचा चमू कटिबद्ध आहे.डॉ. विनीता पुरी, विभाग प्रमुख, (प्लास्टिक सर्जरी), केईएम