मुंबई : विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निधी वाटपात दुजाभाव मिळत असल्यामुळे महापौर रितू तावडे यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषत: झाडे पडणे, इमारत कोसळणे, वाहतूक व्यवस्था, रस्त्यावर पाणी साचणे, नागरिकांची सुरक्षितता तसेच विविध नागरी सुविधा यावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
“मुंबईत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर नागरिकांसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. मुंबईच्या विद्यमान महापौरांकडे याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार करून विविध प्रश्न मांडले आहेत. मात्र त्याबाबत अद्याप कोणतेही लेखी उत्तर प्राप्त झालेले नाही. महापौर कार्यालयानेही अपेक्षित प्रतिसाद दिला नाही,” असे निवेदन किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.