मुंबई (प्रतिनिधी)
कोकणातील आंबा व काजू शेतकऱ्यांचा आक्रोश, गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच, मुंबईच्या रस्त्यांवर प्रकट होणार आहे. येत्या १५ मे रोजी याबाबत गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान असा एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याबाबत पुढाकार घेतला असून यात उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही सहभागी होणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारने त्यांनी हेक्टरी अवघी २२ हजार रुपयांची मदत करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. या सरकारला गुडघे टेकायला भाग पाडण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांच्यासोबत आपण रस्त्यावर उतरणार आहोत असे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मत्स्य शेतकरी हा कोकणचा कणा आहे. कोकणातील हे तीनही शेतकरी सध्या संकटात आहे. चालू वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार, फळमाशीचा प्रादुर्भाव,
वाढता किटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा संशोधन , कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ मधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र राज्यातील कृषी , फलोत्पादन , मत्स्य विभागाने सर्व उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
१५ मे रोजी गिरगांव चौपाटी येथून सायंकाळी ४ वाजता मोर्चा वर्षा निवासस्थानाकडे रवाना होईल. या मोर्चामध्ये शिवसेनेबरोबर , मनसे , राष्ट्रीय कॅाग्रेस , शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह इतर संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आजच्या बैठकीला खासदार अरविंद सावंत , मा. खासदार विनायक राऊत , मा. आमदार बाळ माने , वैभव नाईक , गणेश गावकर , किरण टेंभुलकर , सुशांत नाईक , अजय तेली, उमेश वाळके यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.
‘त्यांची’ कर्जे माफ, ‘हे’ वाऱ्यावर
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदा कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडल्यानंतर मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून उद्योगपतींची कर्जे माफ करण्याचा सपाटा लावला आहे व शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे मुंबईतील सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून हा लढा यशस्वी करेल.