मुंबई : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून लघुदाब वीज ग्राहकांना त्यांचे पाच हजार रुपयांपर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येणार आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांसोबतच इतरांनीही सुरक्षित, सुलभ आणि नि:शुल्क असलेल्या डिजिटल पर्यायांचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आयोगाच्या आदेशानुसार लघुदाब वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक वगळून) सर्व ग्राहकांना दरमहा कमाल पाच हजार रुपयांपर्यंतच वीजबिल रोख भरता येणार आहे. तर लघुदाब कृषिपंप ग्राहकांसाठी रोखीने वीजबिल भरण्याची कमाल मर्यादा महिन्यासाठी १० हजार रुपये आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच ग्राहकांसाठीच्या मोबाईल ॲॅपद्वारे केव्हाही आणि कुठूनही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मर्यादेशिवाय वीजबिलाचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कल्याण परिमंडळात जुलैमध्ये ३३ हजार ग्राहक
कल्याण परिमंडलात जुलै-२०२३ मध्ये ३३ हजार ८९ लघुदाब ग्राहकांना पाच हजार रुपयांपेक्षा अधिकचे ३६ कोटी ५ लाख रुपयांचे वीजबिल आले होते. यात कल्याण एक मंडळातील ९ हजार ४८८, कल्याण दोन मंडळातील ११ हजार २२६, वसई मंडलातील ९ हजार १३४ तर पालघर मंडळातील ३ हजार २४१ ग्राहकांचा समावेश आहे.