मुंबई : सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना राज्य सरकारच्या भिक्षागृहात निवारा दिला जातो. अशा भिक्षुकांना कामाचा मोबदला दिला जातो. मात्र आता मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुरुष व महिला भिक्षागृहांमध्ये राहणाऱ्या ३६८ भिक्षुकांना आता दररोज ५ रुपयांच्या ऐवजी ४० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आठ पट मेहनत मोबदल्यात वाढ करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोबदला देण्यास सुरुवात होणार आहे.
महिला व बालविकास विभागाने यासाठी महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध (संशोधन) अधिनियम-१९६४ मध्ये दुरुस्ती करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार भिक्षागृहांमध्ये राहणाऱ्या भिक्षुकांकडून समाधानकारक प्रगती आणि चांगल्या वर्तणुकीच्या आधारे प्रशिक्षणादरम्यान त्यांना दररोज ४० रुपये मेहनताना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने एप्रिल २०२५ मध्ये या वाढीव मानधनाला मंजुरी दिली. मात्र अद्याप हे वाढीव मानधन देण्यात आलेले नाही. राज्यातील १४ शासकीय भिक्षागृहांमध्ये सध्या ३६८ भिक्षुक आहेत.