मुंबई

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेत एमएससीडीए पॅनला घवघवीत यश

सदर निवडणुकीमध्ये एकूण ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते

वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या पंचवार्षिक २०२२ निवडणुकीसाठी सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या ‘एमएससीडीए पॅनलमधील’ सहाही उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य मिळवून गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीमध्येही घवघवीत यश मिळवून विजयाची पताका अधिक उंचीवर नेली आहे.

सदर निवडणुकीमध्ये एकूण ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानाचा अधिकार असलेल्या नोंदणीकृत फार्मासिस्टपैकी १७ जूनपर्यंत एकूण १,०९,५७५ मतदारांचे बॅलेट पेपर परिषदेकडे पोच झाले होते. २५ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरु होऊन ती रात्री संपली. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद पाटील (सहाय्यक आयुक्त-अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य) यांनी निकाल जाहीर केला. त्यात विजय पांडुरंग पाटील, सांगली यांना ९०,००४, सौ. सोनाली देविदास पडोळे, नागपूर यांना ८९,५०५, मनोहर सोपान कोरे, औरंगाबाद यांना ८९,३३५, अतुल अशोकराव अहिरे, नाशिक यांना ८८,४९८, गणेश चंद्रकांत बंगळे, बुलढाणा यांना ८८,४३९ आणि नितीन नवनीतराव मणियार, मुंबई यांना ८७,७१९ मते मिळाली.

सातव्या क्रमांकाच्या उमेदवारास ६,००४ इतक्या मतांवरच समाधान मानावे लागले. एमएससीडीए पॅनलने जाहीरनाम्याद्वारे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तंतोतंत केली जाईल, असे आश्वासन निकालानंतर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिले व सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. तसेच एमएससीडीए चे सचिव अनिल नावंदर व इतर पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि त्यांची तळागाळापर्यंत जोडली गेलेली टीम यांच्या विशेष परिश्रमामुळे हे यश प्राप्त होऊ शकले अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा