मुंबई : बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बाह्यवळण मार्गाचे काम यंदाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार नाही. यासाठी डिसेंबर उजाडणार असल्याने यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. परंतु, या मार्गावरील लांजा , कोलेटी, संगमेश्वर आणि निवळी येथील उड्डाणपुलांचे काम गणेशोत्सवाआधी मार्गी लागणार असल्याने कोकणवासीयांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संगमेश्वर येथे महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून ते गणेशोत्सवाआधी पूर्ण होणार आहे. पावसामुळे कामात अडथळा येत असला तरी ते पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे खेड येथे खचलेल्या भागाचीही दुरुस्ती करण्यात येत आहे.
रेल्वे पूल, नदीपुलाचे काम अपूर्ण...
या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी माणगाव आणि इंदापूर बाह्यवणळ मार्गाचे (बायपास) काम गणेशोत्सवाआधी पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले . बाह्यवळणाचे काम सुरू असले तरी माणगावमधील रेल्वे पूल आणि नदीपुलाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर उजाडणार आहे. मात्र, इंदापूर बाह्यवळण मार्गावरील एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न असून तसे झाल्यास निदान इंदापूरमधील वाहतूक कोंडी काही प्रमाणात टळणार आहे.