मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जुन्या व अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी म्हाडाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली आहे. पावसाळापूर्व सर्वेक्षणात घोषित करण्यात आलेल्या ८६ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू व रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले.
म्हाडा मुख्यालयात शुक्रवारी आयोजित पावसाळापूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मुंबई बेटावरील अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती तत्काळ रिकाम्या करून घेणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती अथवा संरचनात्मक उपाययोजना तातडीने सुरू करणे तसेच रहिवाशांना सुरक्षित पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार ८६ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारतींमध्ये २२५६ निवासी व ४८० अनिवासी असे एकूण २७३६ भाडेकरू व रहिवासी वास्तव्यास आहेत.
दरडप्रवण क्षेत्रात ३९ संरक्षण भिंती
भूस्खलन, दरड कोसळणे आणि माती घसरण्याच्या संभाव्य धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जयस्वाल यांनी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्याकडून जाणून घेतली. म्हाडाकडून एकूण ३९ संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली असून सर्व निकष पाळून त्यापैकी २८ भिंती बांधण्यात आल्या आहेत.