मीरारोड : पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांसमोर लेप्टोस्पायरोसिससह विविध जलजन्य आजारांचे संकट उभे राहिले आहे.
गटारे तुंबणे, रस्त्यांवर साचलेले दूषित पाणी तसेच उंदरांसह इतर प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः मुंबई, मीरा-भाईंदर, वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.
पुराचे किंवा साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पुढील दोन ते तीन आठवड्यांत ताप किंवा इतर लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दूषित पाण्यातून चालताना त्वचेवरील जखम, खरचटलेली जागा किंवा डोळे, नाक आणि तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जंतू शरीरात प्रवेश करू शकतात. या आजाराची सुरुवात अचानक तीव्र ताप, अंगदुखी, स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, थंडी वाजणे, मळमळ, उलट्या आणि अशक्तपणा अशा लक्षणांनी होते. अनेकजण ही लक्षणे साध्या व्हायरल तापाची समजून दुर्लक्ष करतात. मात्र, वेळेत उपचार न झाल्यास हा आजार किडनी, यकृत आणि फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. काही रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचारांची आवश्यकता भासू शकते.डॉ. अकलेश तांडेकर, आरोग्य तज्ज्ञ