मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार लक्षात घेऊन शहरातील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही, महापालिकेने बोरिवली गोराई परिसरात कबुतरखान्यासाठी जागा निश्चित केली आहे. मात्र या प्रस्तावित कबूतरखान्याला मनसेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पालिकेच्या आर मध्य विभागातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच पालिकेने हा निर्णय मागे घेतला नाही, तर याठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल; असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
कबुतरांमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या दृष्टीने मुंबई उच्च मुंबई न्यायालयाने महानगरपालिकेला कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, या बंदीविरोधात जैन समाज आक्रमक झाल्यानंतर न्यायालयाने मुंबई महापालिका प्रशासनाला लोकवस्तीपासून दूर ठिकाणी कबुतरखान्यासाठी पर्यायी जागा सुचवण्याचे निर्देश दिले. यानंतर पालिकेने चार ठिकाणी कबुतरंखानासाठी जागा प्रस्तावित केल्या. त्यातील एक जागा बोरिवली गोराई परिसरातील आहे. पालिकेच्या या निर्णयाला मनसे पक्षाच्या कडाडून विरोध करण्यात आला आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडून अहवाल मागवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ज्याठिकाणी पालिका कबुतरखाना तयार करू इच्छिते, त्या परिसरात किमान २०-२५ हजार लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेने हा निर्णय रद्द केला नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.कबीरदास मोरे, बोरिवली विभाग अध्यक्ष, मनसे