मुंबई : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा मुंबईकरांना आणखी काही दिवस करावी लागणार आहे. प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती थांबली आहे. दरम्यान, २२ जूननंतर वातावरण अनुकूल असून पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. दरम्यान, ३० जूनपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन १० टक्के पाणी कपातीत वाढ करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.
८ जून रोजी पावसाने दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्याची प्रगती मंदावली आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून असली तरी यंदा त्यात विलंब झाला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांची गती मंदावल्याने महाराष्ट्र किनारपट्टी आणि अंतर्गत भागात आर्द्रतेचा कमी झाली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली निर्माण न होणे आणि मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) निष्क्रिय असणे ही मान्सूनच्या विलंबा मागील प्रमुख कारणे आहेत.