मुंबई : तिसरी मुंबई (मुंबई ३.०) या महत्त्वाकांक्षी नव्या शहर संकल्पनेच्या अंमलबजावणीकडे निर्णायक पाऊल टाकत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रायगड जिल्ह्यातील नव्या ग्रोथ सेंटरसाठी २१६ एकर हेक्टर जमीन भूधारकांच्या संमतीने संपादित केली आहे. एमएमआरडीएच्या भूसंपादन धोरणाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली हा करार पार पडला.
एमएमआरडीएच्या सहभागात्मक भूसंपादन धोरणाची अंमलबजावणी सुरू होताच भूधारकांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद देत संमती दर्शवली आहे. एमएमआरडीएला अल्पावधीत मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात यश आले आहे. हा प्रतिसाद मुंबई ३.० च्या मूलभूत तत्त्वांना अधोरेखित करतो तसेच स्थलांतर नव्हे, तर संमतीतून विकास या मॉडेलमध्ये भूधारक केवळ भरपाई घेणारे घटक न राहता प्रादेशिक विकासाचे दीर्घकालीन भागीदार बनत आहेत.
जागतिक शहर उभारण्याच्या दिशेने पाऊल
मुंबई ३.० ही शहरी विकासाची नवी दिशा आहे. जी खऱ्या अर्थाने लोकांसाठी आणि लोकांच्या सहभागातून साकारली जाणार आहे. या सहभागात्मक मॉडेलद्वारे आपण केवळ जमीन संपादित करत नाही, तर विश्वास निर्माण करत आहोत. हा करार प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणारे जागतिक दर्जाचे शहर उभारण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकांच्या सहभागातून शहर उभे राहणार
मुंबई ३.० म्हणजे केवळ नवे शहर नव्हे, तर लोकांच्या सहभागातून उभे राहणारे शहर आहे. जमीनधारकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद या मॉडेलवरील वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे. या टप्प्यानंतर आपण नियोजनातून अंमलबजावणीकडे ठोसपणे वाटचाल करत आहोत, असे उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले.
प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना
या प्रकल्पातून २ लाखांहून अधिक उच्च-कौशल्ययुक्त व चांगल्या वेतनाच्या थेट रोजगारनिर्मिती तसेच मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करणे, मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक व खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबत प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.