मुंबई एअरपोर्टवर १० रुपयांत चहा; राघव चड्ढांचा उडान यात्री कॅफेतील अनुभव चर्चेत, पाहा Video 
मुंबई

मुंबई एअरपोर्टवर १० रुपयांत चहा; राघव चड्ढांचा उडान यात्री कॅफेतील अनुभव चर्चेत, पाहा Video

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी 'उडान यात्री कॅफे'मध्ये केवळ १० रुपयांत चहा घेतल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

विमानतळांवरील महागड्या खाद्यपदार्थांवर कायम टीका होत असताना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगळा अनुभव समोर आला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी 'उडान यात्री कॅफे'मध्ये केवळ १० रुपयांत चहा घेतल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

स्वस्त दरात चहा, खासदारांचा अनुभव चर्चेत

राघव चड्ढा यांनी X वर पोस्ट करत सांगितले की, दिल्लीच्या फ्लाइटची वाट पाहत असताना त्यांनी या कॅफेमध्ये चहा घेतला. फक्त १० रुपयांत मिळालेल्या चहाने सुखद धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले.

काय आहे उडान यात्री कॅफे?

'उडान यात्री कॅफे' ही संकल्पना प्रवाशांना परवडणाऱ्या दरात अन्न व पेये उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम केंद्र सरकारच्या UDAN योजनेशी संबंधित असून, विशेषतः बजेट प्रवासी आणि पहिल्यांदाच विमानप्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो.

महागड्या विमानतळ खाद्यपदार्थांवर प्रश्न

विमानतळांवरील खाद्यपदार्थांच्या जास्त किंमतीबाबत प्रवाशांकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत 'उडान यात्री कॅफे' हा एक सकारात्मक पर्याय ठरत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

राघव चड्ढा यांनीही आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, स्वस्त दरात अन्न देणे शक्य असून 'उडान यात्री कॅफे' त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे.

सोशल मीडियावर कौतुक

या पोस्टनंतर सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असून, देशातील इतर विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरही अशी सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.

देशभर विस्ताराची मागणी

सध्या देशात १५० हून अधिक विमानतळ असले तरी ‘उडान यात्री कॅफे’ फक्त सुमारे १० ते १२ विमानतळांवरच उपलब्ध आहेत. त्यामुळे ही सुविधा देशातील सर्व विमानतळांवर सुरू करावी, अशी मागणी राघव चड्ढा यांनी सरकारकडे केली होती. तसेच, चेक-इन आणि सुरक्षा तपासणीनंतरच्या डिपार्चर एरियामध्ये हे कॅफे असणे अधिक उपयुक्त ठरेल, कारण प्रवासी बोर्डिंगपूर्वी सर्वाधिक वेळ याच ठिकाणी थांबतात आणि याच दरम्यान चहा-नाश्ता खरेदी करण्याची शक्यता अधिक असते, असेही त्यांनी नमूद केले होते. दरम्यान, त्यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

मुंबईत सर्वसामान्यांसाठी २ हजार ६४० घरे; आजपासून म्हाडाचा अर्ज भरता येणार

Mumbai : खार येथील जान्हवी कुकरेजाच्या आईची उच्च न्यायालयात धाव; मैत्रीण दिया पडळकरच्या निर्दोष सुटकेला आव्हान

Mumbai : मालमत्ता करासाठी अखेरचे दोन दिवस; सुविधा केंद्र रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

सायबर फसवणुकीवर लगाम; RBIकडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल, १ एप्रिलपासून नवे सुरक्षा नियम लागू

Navi Mumbai : पावसाळ्यासाठी सिडको प्रशासन सज्ज! १ जूनपासून २४ तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित