मुंबई : अंधेरीतील आंबिवली येथील बगीचा व उद्यानासाठी आरक्षित असलेल्या १ हजार ८४० चौरस मीटर भूखंडाचे आरक्षण रद्द करून हा भूभाग लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यास मुंबई महापालिकेच्या सुधार समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. विशेष म्हणजे, प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता तो मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी बैठकीत गोंधळ निर्माण झाला.
आंबिवलीतील भूखंड क्रमांक ३४ वर एकूण २ हजार २७८ चौरस मीटर क्षेत्र बगीचा व उद्यानासाठी आरक्षित आहे. यापैकी १ हजार ८४० चौरस मीटर क्षेत्रावर सध्या लक्ष्मीनारायण मंदिर आहे. श्रीमद् भारत मंडळी या धर्मादाय संस्थेच्या विनंतीनुसार मंदिराच्या पुनर्बाधणीसाठी या भागावरील बगीचा व उद्यानाचे आरक्षण हटविण्याची मागणी करण्यात आली होती.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी यासंदर्भात महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर प्रशासनाने आरक्षण बदलाचा प्रस्ताव सुधार समितीसमोर मांडला. या भूखंडाचा वापर यापूर्वी विविध विकास आराखड्यांमध्ये खेळाचे मैदान, समाजोपयोगी सुविधा, मनोरंजन मैदान तसेच बगीचा व उद्यानासाठी दर्शविण्यात आला होता. भूभाग विकास नियोजन रस्त्याने बाधित असून तो निवासी क्षेत्रात असल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले.
चर्चेशिवाय प्रस्ताव मंजूर
दरम्यान, प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर केल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उबाठा आणि काँग्रेसच्या सदस्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. बैठकीत झालेल्या गोंधळादरम्यान प्रस्तावाची प्रत फाडण्यात आली. यावरून सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.