मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाला गेल्या १० वर्षांत उतरती कळा लागल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. बेस्टच्या ताफ्यात १० वर्षांपूर्वी स्वमालकीच्या जवळपास चार हजार बसेस होत्या. मात्र २०२५-२६ मध्ये बेस्टकडे आता एकूण २७८७ बसेस असून स्वमालकीच्या फक्त २४९ बसेस शिल्लक आहेत. त्यामुळे ‘बेस्ट’ आता भाडेतत्त्वावरील बसेसवर अवलंबून आहे.
सन २०१५-१६ मध्ये बेस्टच्या ताफ्यात ३,९६३ बसेस होत्या. त्यावेळी भाडेतत्त्वावरील बस ही संकल्पनाच बेस्ट उपक्रमात नव्हती. २०१५-१६ मध्ये प्रत्येक बसमागे सरासरी ८३७ प्रवासी प्रवास करत होते, तर प्रति बस रोजचे उत्पन्न १०,७५३ रुपये होते. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ताफा ३,७४९ बसेसवर आला, तर प्रति बस प्रवासी संख्या ८६७ इतकी होती. मात्र उत्पन्न घटून १०,०१२ रुपयांवर आले आहे.
आता दहा वर्षांनंतर २०२५ - २६ मध्ये चित्र पूर्णपणे बदलले आहे. ‘बेस्ट’कडे केवळ स्वमालकीच्या २४९ बसेस असून २,५१८ भाडेतत्त्वावरील बसेससह एकूण ताफा २,७८७ बसेसवर आला आहे. २०२५ - २६ मध्ये प्रति बस प्रवासी संख्या ७५७ वर आली असून प्रति बस उत्पन्नही ९,३६३ रुपयांपर्यंत खाली आले आहे.तज्ज्ञांच्या मते, वाढती वाहतूक कोंडी, मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहतूक पर्यायांची उपलब्धता, मार्गांमध्ये झालेले बदल तसेच स्वमालकीच्या बसेसची झालेली घट यामुळे बेस्टच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.