मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. यामुळे नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले आहे.
मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत.
पाण्यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरिनचा पुरेसा वापर केला जात आहे. तरी नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्त झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.