Mumbai : आजपासून प्रशासकीय राजवट संपुष्टात! महापौर, उपमहापौर सूत्रे हाती घेणार; सभागृह, सभागृहाबाहेर सजावट, रंगरंगोटी 
मुंबई

Mumbai : आजपासून प्रशासकीय राजवट संपुष्टात! महापौर, उपमहापौर सूत्रे हाती घेणार; सभागृह, सभागृहाबाहेर सजावट, रंगरंगोटी

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपल्यानंतर ८ मार्चपासून प्रशासकीय राजवट लागू होती. मात्र आजपासून पुन्हा लोकप्रतिनिधी राज्य सुरू होत असून महापौर व उपमहापौर यांच्या नावांची घोषणा होणार आहे. विविध समिती अध्यक्षांची दालने आणि सभागृह सज्ज करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आणि ८ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता मुंबई महापालिकेची निवडणूक झाली असून पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे तब्बल चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आजपासून (दि.११) 'लोक प्रतिनिधी राज्य' सुरू होणार आहे. बुधवारी महापौर व उपमहापौर यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षण, स्थायी समितीसह विविध समिती अध्यक्षांची दालने पुन्हा एकदा नव्याने सज्ज झाली असून सभागृहाची सजावट करण्यात आली आहे. मुख्यालयाबाहेरील रस्त्यावरही भाजपने झेंडे लावले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे.

सभागृहाबाहेर रस्त्यावरही भाजपने झेंडे लावले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आणि ७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि ८ मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांच्या हाती पालिकेचा कारभार गेला. त्यानंतर बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प असो वा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून त्या त्या आयुक्तांनी सादर केला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे हाती घेतली जातात ती ही प्रशासक म्हणून आयुक्त जातीने लक्ष घालत होते. तत्कालीन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तर नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात नगरसेवक नसल्याची खंत जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेत नगरसेवक असणे गरजेचे असून प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवणे, करदात्यांना मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध होतात की नाही याकडे लक्ष देणे ही नगरसेवकांची जबाबदारी आहे. परंतु प्रशासकीय राजवटीत सगळे काही रामभरोसे होते. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणुकीत उमेदवार न दिल्याने महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार रितू तावडे यांच्या नावाची आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार संजय घाडी यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी आयुक्त भूषण गगराणी करणार आहेत.

सुरक्षा नियम कठोर

मुंबई महापालिकेचे मुख्यालय असल्याने इथे येणाऱ्यांसाठी सुरक्षेचे नियम कठोर करण्यात आले असून विविध सुरक्षा तपासणीसह ओळखपत्रांचीही नीट तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच त्या व्यक्तीला इमारतीत प्रवेश देण्यात येत आहे.

मुंबई पालिकेत शिंदेसेनेची ताकद वाढली

सुधार समिती अध्यक्षपद आपल्याकडे राहावे यासाठी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आकड्यांचे गणित जुळवण्यासाठी अखेर दोन्ही राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांना आपल्याकडे वळते करण्यात यश मिळाले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तिन्ही नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा देत एकत्रित गट स्थापन केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेचा नगरसेवकांचा आकडा २९ वरून ३३ वर गेला आहे

अजित पवारांचा मृत्यू हा घातपात! रोहित पवार यांचा संशय; आंतरराष्ट्रीय संस्थांकडून चौकशी करण्याची मागणी

चंद्रपुरात ठाकरे सेनेची भाजपशी युती; काँग्रेसचा एका मताने पराभव

तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन, भूवाटप धोरणास मान्यता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

नरवणेंच्या पुस्तक वादावर प्रकाशन कंपनीचा खुलासा; पुस्तक अद्याप प्रकाशित नाही, प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे!

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; ११८ खासदारांच्या सह्या, राहुल यांची सही नाही