मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात पुन्हा गळती लागल्याची समस्या निर्माण झाली. बोगद्यातील काही सांध्यांमधून गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणी झिरपू लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई महापालिकेने रविवारी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली. गळती थांबवण्यासाठी विशेष प्रकारच्या पॉलिमर ग्राऊटिंग इंजेक्शनचा वापर करण्यात येत असून ओलसर भागांवर रासायनिक प्रक्रियेद्वारे सीलिंगचे काम सुरू आहे.
हा बोगदा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच गळतीची समस्या प्रथम समोर आली होती. त्यावेळीही बोगद्याच्या छत आणि सांध्यांमधून पाणी झिरपू लागल्याने तातडीने दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा काही सांध्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळून आले आहे. बोगद्यात दोन्ही बाजूंना एकूण ४३ सांधे असून त्यापैकी काही ठिकाणी गळती सुरू झाली आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १५ ते २० मीटर खोलीवर हा बोगदा बांधण्यात आल्यामुळे मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या पाण्याच्या दाबामुळे पाणी झिरपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गळती थांबवण्यासाठी सांध्यांमध्ये पॉलिमर ग्राऊटिंग इंजेक्शन देऊन सीलिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सुमारे १४ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा सागरी किनारा मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. १२ मार्च २०२४ रोजी वरळी येथील बिंदू माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राइव्ह या नऊ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राइव्हदरम्यानचा २.०७ किलोमीटर लांबीचा बोगदा सुरू झाल्याने वरळी ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत करणे शक्य झाले.