अमित श्रीवास्तव/मुंबई
मुंबईतील केवळ १८.९% रहिवासी शौचावाटे रक्त पडणे आणि मलविसर्जनाच्या सवयींमधील बदल ही मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे असल्याचे ओळखतात.
मुंबईत पचनसंस्थेच्या आरोग्यविषयक सर्वेक्षण हाती घेतले होते. त्यात या आजाराबद्दल असलेल्या जागरूकतेचा धक्कादायक अभाव समोर आला आहे. मुंबईतील ७८६ जनतेने दिलेल्या मुलाखतीवर आधारित या विश्लेषणातून लोकांच्या वर्तणुकीतील चिंताजनक कल आणि आरोग्य सल्ल्यासाठी होणारा विलंब दिसून येतो. ८५% पेक्षा जास्त लोकांनी सांगितले की, शौचाच्या सततच्या समस्यांसाठी ते डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी मेडिकलमधील औषधांवर किंवा जीवनशैलीतील बदलांवर अवलंबून राहतील, तर ८७.५% लोकांनी ॲॅसिडिटी आणि अपचनासारखी लक्षणे स्वतःच हाताळत असल्याचे मान्य केले.
शहरात पचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. सुमारे ५८% प्रतिसादकर्त्यांनी अनियमित शौचाची तक्रार केली, तर निम्म्याहून अधिक लोकांना पोट पूर्णपणे साफ होत नसल्याचे जाणवते. केवळ २२.२% लोकांना याची जाणीव होती की पचनसंस्थेचे गंभीर आजार वेदनांशिवाय असू शकतात.
जीवनशैली आणि जोखीम
जवळपास ८६% लोक वारंवार बाहेरचे किंवा पॅकेज अन्न खातात, तर अर्ध्याहून अधिक लोक नियमित व्यायाम करत नाहीत. ४१.९% लोकांनी तंबाखूचे सेवन करत असल्याचे सांगितले, ज्यामुळे आतड्याच्या कर्करोगासह पचनसंस्थेच्या आजारांचा धोका वाढतो. अपोलो हॉस्पिटल्स, हिरानंदानी हॉस्पिटल आणि सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसह अग्रगण्य आरोग्य संस्थांच्या तज्ज्ञांनी इशारा दिला की, जागरूकतेचा अभाव आणि उपचारांना होणाऱ्या विलंबामुळे आजाराचे निदान शेवटच्या टप्प्यात होत आहे.
आतड्याच्या कर्करोगाची सुरुवात अनेकदा लहान गाठींमधून होते आणि लवकर ओळखले न गेल्यास ते शांतपणे वाढत राहतात. विष्ठेतील बदल, रक्त पडणे, पोटातील अस्वस्थता, थकवा किंवा कारणाशिवाय वजन कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.डॉ. ज्योती वाजपेयी