मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ सोमवारी ९० टक्के भरले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची पूर्ण संचय पातळी २८५ मीटर असून पाणी पातळी सोमवारी २८२.१३ मीटरपर्यंत पोहोचली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाच्या अनुषंगाने धरणाचे ३ दरवाजे (क्रमांक १, क्रमांक ३ व क्रमांक ५) दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ३००० क्युसेक वेगाने जल विसर्ग सुरू आहे. मध्य वैतरणा धरणातून सोडण्यात येणारे पाणी ‘मोडक सागर’ (निम्न वैतरणा) जलाशयात साठविले जाते, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये एकूण ६७.८८ टक्के जलसाठा जमा झाला आहे.
पालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन २०१४ मध्ये पूर्ण केले. या धरणाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे करण्यात आले आहे. या जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १९,३५३ कोटी लिटर (१९३,५३० दशलक्ष लिटर) इतकी आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे. सोमवारी पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून सुमारे ६७.८८ टक्के इतका जलसाठा आहे. त्यामुळे आता मुंबईची पाणी चिंता मिटली आहे.
तीन दरवाज्यांतून ३००० क्यूसेक विसर्ग
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय पाणलोट क्षेत्रात १ हजार ५०७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सोमवारी धरण ९० टक्के भरले आहे. धरणाची पूर्ण संचय पातळी २८५ मीटर असून पाणी पातळी सोमवारी २८२.१३ मीटरपर्यंत पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी दुपारी १.१५ वाजल्यापासून धरणाचे ३ दरवाजे (क्रमांक १, क्रमांक ३ व क्रमांक ५) ३० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या तीन दरवाज्यांतून ३००० क्यूसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली.