मुंबई : गणेशोत्सव डीजे लावण्यावरून वाद निर्माण झाला आहे. पुण्यात डिजे विरोधात एल्गार पुकारला आहे, तर मुंबईत ही डीजे, लाऊड स्पीकर लावण्यावरून वाद निर्माण झाला असताना लाऊडस्पीकर लावा पण नियमांचे पालन करा, असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड नरेश दहिबावकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. प्रेस क्लब येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
गणेशोत्सवात डीजे लावू नका असे म्हणणार नाही, पण आवाजाची मर्यादा राखली पाहिजे. लाऊडस्पीकर लावा पण नियमांचे पालन करून हे आवाहन कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्ष, मंडळ किंवा गटाला उद्देशून नसून गणेशोत्सवाची प्रतिष्ठा कायम राखण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे.
दरम्यान, उंच गणेशमूर्तींबाबत राज्य सरकार व मुंबई महापालिकेने एसओपी तयार करावी, तज्ज्ञांची नियुक्ती करावी, असेही दहिबावकर यांनी यावेळी सांगितले.
“गणेशोत्सवादरम्यान वाजवली जाणारी गाणी ही उत्सवाच्या भावनेला साजेशी असावीत. भाविक जेव्हा गणेश मंडपात दर्शनासाठी येतात, तेव्हा त्यांना भक्ती, संस्कृती आणि सामाजिक संदेशांचा अनुभव मिळावा. त्यामुळे गाण्यांची निवड करताना मंडळांनी जबाबदारीने वागावे,” असे दहिबावकर यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी गणेशोत्सवात तरुणांचा वाढता सहभागही अधोरेखित केला. पूर्वी अनेक मंडळे देणग्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असत. मात्र आता नव्या पिढीतील, विशेषतः जेन झी स्वतःच्या खिशातून आर्थिक योगदान देत असून उत्सवाच्या नियोजनात आणि आयोजनात सक्रिय भूमिका बजावत आहेत, असे त्यांनी सांगितले.
कृत्रिम विसर्जन तलावांची संख्या वाढली
यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन दहा दिवस चालणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शहरातील कृत्रिम विसर्जन तलावांची संख्याही यंदा वाढून सुमारे ३५५ झाली आहे. अधिकाधिक भाविकांनी समुद्राऐवजी कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. समुद्रात विसर्जन केल्यामुळे होणारे पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता कृत्रिम तलावांकडे वाढणारा कल सकारात्मक असल्याचे समितीचे सचिव गिरीश वालावलकर यांनी सांगितले.