मुंबईला मिळणार मुबलक पाणी; गारगाईचे पाणी जलबोगद्याने मोडकसागरमध्ये आणणार; धरण, जलबोगद्यासह अन्य कामांवर प्रकल्प सल्लागार प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईला मिळणार मुबलक पाणी; गारगाईचे पाणी जलबोगद्याने मोडकसागरमध्ये आणणार; धरण, जलबोगद्यासह अन्य कामांवर प्रकल्प सल्लागार

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ केवळ चर्चेत असलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. धरणाच्या बांधकामासह गारगाई नदीचे पाणी मोडकसागर जलाशयात आणण्यासाठी प्रस्तावित जलबोगदा आणि अन्य कामांवर देखरेख करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या दोन दशकांहून अधिक काळ केवळ चर्चेत असलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. धरणाच्या बांधकामासह गारगाई नदीचे पाणी मोडकसागर जलाशयात आणण्यासाठी प्रस्तावित जलबोगदा आणि अन्य कामांवर देखरेख करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सल्लागारासाठी २४ कोटी १४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. गारगाई धरण सेवेत उपलब्ध झाल्यानंतर मुंबईतील पाणी टंचाई नियंत्रणात येईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबईची वाढती पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेने गारगाई प्रकल्प हाती घेतला आहे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार मध्य वैतरणा धरणानंतर आता गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रकल्पाची प्राथमिक अभियांत्रिकीची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.

६९ मीटर उंच धरण, १.६ किमीचा जलबोगदा

गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर प्रस्तावित आहे. या ठिकाणी ६९ मीटर उंचीचे आणि ९७९ मीटर लांबीचे धरण उभारण्यात येणार आहे. धरणातील पाणी मोडकसागर जलाशयात आणण्यासाठी अंदाजे १.६ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. तसेच सर्व कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल.

४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार

मुंबईला सध्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांतून दररोज सुमारे ४ हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. मात्र, मुंबईची सध्याची मागणी सुमारे ४ हजार ६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन असल्याने जवळपास ६०० दशलक्ष लिटरची तूट आहे.

गारगाई महत्त्वाचा जलस्रोत ठरणार

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता २०४१ पर्यंत दररोज सुमारे ६ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत गारगाई धरण महापालिकेसाठी महत्त्वाचा जलस्रोत ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मुंबईच्या पाणीपुरवठ्यात उपलब्ध होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी

वाशीत कौटुंबिक वादातून मुलानेच केली आईची हत्या; आरोपी अटकेत

ठाणेकरांवर करवाढीचे ओझे; प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत सादर

बारवी ओव्हरफ्लो! ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपले