पेण : मुंबईहून कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी वाहनचालकांना आता खारपाडा येथील पहिल्या ‘टोलधाडी’ला (टोलनाका) सामोरे जाऊनच पुढे जावे लागणार आहे. या टोल वसुलीची सुरुवात शुक्रवारी सकाळपासून केली. टोलवसुली सुरू होणार म्हणून, अगोदर सुविधा द्या, नंतर टोल वसुली करा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेने कडून करण्यात आली होती. मात्र महामार्गापासून २० किलोमीटर अंतरावरील वाहनमालकांना मासिक सवलतीचा पास देण्यापूर्वीच ही टोलधाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केली.
ही टोलवसुली खारपाडा ते कासू या ४२ किलोमीटर अंतर महामार्गासाठी केली जात आहे. या टोलधाडीचा आकडाही मोठा आहे. प्रवाशांना आता खारपाडा टोलनाक्यावर ९५ रुपयांचा टोल द्यावा लागणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम आणि सुविधा पूर्ण नसतानाच उन्हाळी सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच टोलवसुली सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही महामार्गावरील कामे संथ गतीने सुरू असून, रुग्णवाहिका, शौचालये, स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत अशा मूलभूत सुविधा अपुऱ्याच असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खारपाडा टोलनाक्यावर स्थानिक रहिवासी आणि सर्व एलएमव्ही वाहनांसाठी टोलमाफी लागू करण्याची घोषणा केली. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांसह स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. त्यामध्ये स्वच्छ व कार्यरत शौचालये, महिलांसाठी व बालकांसाठी स्तनपान कक्ष, आपत्कालीन रुग्णवाहिका व प्रथमोपचार केंद्र, खराब वाहनांसाठी क्रेन सेवा, सुरक्षित व प्रकाशयुक्त दुतर्फा रस्ता तसेच टोल व्यवस्थापनात स्थानिक युवकांना रोजगार देण्याची प्रमुख मागणी आहे. तसेच MH ०६ या वाहनांना टोल पासून मुक्ती मिळावी ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.