Mumbai : सरकारी रक्त पिशव्या खासगी बँकेकडे वळवल्या; दोन माजी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल 
मुंबई

Mumbai : सरकारी रक्त पिशव्या खासगी बँकेकडे वळवल्या; दोन माजी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासन आणि राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या चौकशीतून सर जे. जे. महानगर रक्तपेढीच्या कारभारातील गंभीर गैरव्यवहार समोर आले आहेत.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव / मुंबई:

अन्न व औषध प्रशासन आणि राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या चौकशीतून सर जे. जे. महानगर रक्तपेढीच्या कारभारातील गंभीर गैरव्यवहार समोर आले आहेत. शासकीय स्तरावर आयोजित रक्तदानाचा छावण्यांमधून गोळा केलेले रक्त एका खासगी रक्तपेढीकडे वळवल्याचे या चौकशीत उघड झाले असून, यामुळे सरकारी रक्तपेढीच्या व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत.

सध्याच्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक (निरीक्षण व मूल्यमापन) तथा ‘एसबीटीसी’चे अतिरिक्त सहाय्यक संचालक डॉ. सुहास मोहनलकर यांनी दोन माजी कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कंत्राटी वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे आणि कंत्राटी वैद्यकीय सामाजिक अधिकारी अजय भिसे यांनी सरकारी रक्तदानाचा छावण्यांमधून गोळा केलेल्या रक्ताच्या पिशव्या बदलापूर येथील ‘माया ब्लड सेंटर’ या खासगी रक्तपेढीकडे वळवल्याचा आरोप आहे. यामुळे सरकारचे आर्थिक नुकसान झाले असून सार्वजनिक रक्त संकलन व्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.

५० रक्ताच्या पिशव्यांची परस्पर विल्हेवाट

तक्रारीनुसार, ४ जानेवारी २०२६ रोजी चिंचपोकळी येथे तरुण मित्र मंडळाने एक रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात जे. जे. महानगर रक्तपेढीने १८८ युनिट रक्त गोळा केले होते. यापैकी ५० रक्ताच्या पिशव्या अजय भिसे याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय परस्पर काढून घेतल्या आणि त्या खाजगी रक्तपेढीमध्ये पाठवल्या.

जानेवारीत झालेल्या अंतर्गत विभागीय चौकशीदरम्यान भिसे याने अधिकृत परवानगीशिवाय रक्त पिशव्या नेल्याची कबुली दिली होती, तसेच लेखी माफीनामा सादर केला.

एफडीए आणि एसबीटीसीची कारवाई

२२ आणि २३ जून रोजी अन्न व औषध प्रशासनाने या रक्तपेढीची तपासणी केली, ज्यामध्ये कारभारातील गंभीर त्रुटी समोर आल्या आणि हे प्रकरण पुन्हा उजेडात आले. या निष्कर्षांच्या आधारे एफडीएने रक्तपेढीचे कामकाज तात्पुरते स्थगित केले आहे. त्यानंतर, ‘एसबीटीसी’ने २४ जून रोजी तीन सदस्यीय समिती स्थापन करून गेल्या तीन वर्षांत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांच्या नोंदींची छाननी सुरू केली. समितीला शिबिरांमध्ये गोळा झालेल्या रक्ताच्या पिशव्या आणि अधिकृत नोंदवहीमधील नोंदींमध्ये मोठी तफावत आढळून आली. यामुळे रक्ताच्या पिशव्या पद्धतशीरपणे गायब केल्याचा आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा संशय बळावला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीला चाप; शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

Mumbai : काँक्रीट, जलवाहिनीने घेतला झाडाचा जीव; चेंबूर प्रकरणात पालिकेच्या पथकाचा प्राथमिक अंदाज

Mumbai : वांद्रे रिक्लेमेशन, वरळीतील समूह पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; सरकारच्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

शेतकरी महिला विधेयक मंजूर; राज्याबाहेरील शेतमजूर महिलांना शेतकरी दर्जा नाही, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती