मुंबई : गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात उभारण्यात आलेला बसथांबा स्थलांतरित करण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती.
नार्वेकर यांच्या मागणीनुसार बसथांबा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी बेस्ट समितीच्या पटलावर ठेवला. मात्र या प्रस्तावाला ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध करत प्रावासी व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होईल, असा मुद्दा लावून धरला. या प्रस्तावावरून उबाठाचे नगरसेवक आणि समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
गेट वे ऑफ इंडिया परिसरात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमाने बसमार्ग क्रमांक ए ११२ आणि ए ११६ हे अनुक्रमे अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) ते गेट वे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान संपूर्ण आठवडा प्रवर्तित होतात.
गेट वे ऑफ इंडिया येथून सागरी मार्गाने एलिफंटा, मांडवा, उरण व अलिबाग येथे जाणारे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांच्यासाठी बसमार्ग क्रमांक ए ११२ आणि ए ११६ हे लास्ट माईल कनेक्टिव्हीट म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावतात. अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गेट वे ऑफ इंडिया दरम्यान सोमवार ते शनिवार प्रतिदिन सरासरी ४३६ बसफेऱ्यामंधून २४ हजार प्रवासी प्रवास करतात. हेच प्रमाण रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाढते व एकूण ५९८ बसफेऱ्यांमधून २८ हजार प्रवासी प्रवास करतात व सरासरी १ लाख ९८ हजार इतका महसूल उपक्रमास प्राप्त होतो. हे बसमार्ग प्रवाशांच्या सोयिचे आणि उपक्रमाच्या महसुलीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मात्र गेट वे ऑफ इंडिया परिसरातील हा मार्ग बदलून तेथील बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोरील योग्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची सूचना केली आहे.