मुंबई : मुंबईतील उघड्या मॅनहोल्सच्या समस्येवरून मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी बृहन्मुंबई महापालिकेची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी पालिका प्रतिबंधात्मक पावले का उचलत नाही आणि नेहमी नागरिकांचा मृत्यू होण्याची वाट का पाहते, असा संतप्त सवाल न्यायालयाने केला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने यासंदर्भात पालिकेने सादर केलेले अहवाल आणि प्रतिज्ञापत्र फेटाळून लावले. पालिकेची ही कारवाई केवळ धूळफेक असून याचा काहीही उपयोग नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मुसळधार पावसात साकीनाका येथे ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या घटनेचा संदर्भ यावेळी देण्यात आला.
याप्रकरणी मुंबई पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दुर्घटनेनंतर संबंधित विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना सुचवल्या जातील, असे पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी सांगितले.
निष्पाप नागरिकांचे प्राण महत्त्वाचे
मॅनहोलबाबत पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे केलेला दावा फेटाळून लावत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. दुर्घटना घडल्यानंतर तुम्ही काय करता यापेक्षा ती रोखण्यासाठी आधी काय उपाययोजना केल्या हे महत्त्वाचे आहे, असे सांगत न्यायालयाने मानवी जीवन मौल्यवान असल्याचे ठामपणे सांगितले.
मुंबईतील पावसाळ्याची परिस्थिती सर्वांना ठाऊक असताना पालिकेने मान्सूनपूर्व काळजी घेणे आवश्यक होते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. यावर पालिकेच्या वकिलांनी शहरातील सर्व उघडी मॅनहोल्स पुढील १२ तासांत बंद केली जातील आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्यास तिथे बॅरिकेड्स लावले जातील, असे आश्वासन दिले. मृत नागरिकाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जुलै रोजी निश्चित केली आहे.
मुंबईत बोट भरकटली
मुंबईतील मनोरी समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर हे तेलवाहू जहाज अडकल्याची घटना समोर आली आहे. हे जहाज निकाराग्वा देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असून त्याची लांबी १८२.७५ मीटर आणि रुंदी ३२.२६ मीटर आहे.
हे जहाज दोन महिन्यांपूर्वी मुंबई बंदरात आले होते. मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे जहाज किनाऱ्याजवळ अडकले असून, सध्या जहाजाने समुद्रात नांगर टाकल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही.
गोराई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी या जहाजाची माहिती मिळाल्यानंतर नौदल, तटरक्षक दल आणि इतर संबंधित सागरी यंत्रणांना तातडीने पाचारण करण्यात आले.
तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीर बंकरिंगच्या आरोपावरून या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात तटरक्षक दलाने तीन जहाजांना ताब्यात घेतले होते, ज्यामध्ये या जहाजाचा समावेश होता. ही जहाजे मुंबईत आणून यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या जहाजांच्या मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यावर न्यायालयाने ही जहाजे स्क्रॅपिंगसाठी अलंग येथे नेण्याचे निर्देश दिले होते. सध्या सर्व सुरक्षा यंत्रणा या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.