मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात कुर्ला- सायन रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर पाणी जमा होते आणि मुंबईच्या लाइफलाइनला ब्रेक लागतो. परंतु आता कुर्ला-सीएसएमटी रोड, माहीम कॉजवे व वाकोला नदीजवळ पंपिंग स्टेशन उभारणीसह अन्य कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात पावसाळ्यात कुर्ला-सायन रेल्वे स्थानका दरम्यान रुळांवर पाणी भरण्यापासून मुक्तता होणार असून रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
भरतीच्या वेळी तसेच विहार आणि पवई तलावामधील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग, सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर दरवर्षी पाणी भरते. परंतु आता पंपिंग स्टेशन उभारणीमुळे रुळांवर पाणी तुंबण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या मिठी नदी प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्यात आले असून त्यातील टप्पा एक अंतर्गत मिठी नदीचे १६ ते ६० मीटरपर्यंत रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर टप्पा दोन अंतर्गत चितळे समिती, केंद्रीय जल विद्युत अनुसंधान संस्था आणि आयआयटी मुंबई यांनी सादर केलेल्या अहवाल तथा शिफारशीनुसार मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण यांनी मिठी नदी विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.