मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून एका तरुणाच्या झालेल्या निर्घृण हत्येचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले.
लोकलमध्ये घडलेल्या या घटनेने देश हादरून गेला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभेत केली. यावर राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करावी आणि सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
मंगळवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या मालाड - कांदिवली स्थानकादरम्यान दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेला. रोशन सुवर्णा नावाच्या प्रवाशाने बॅगेतील चाकू काढून मयंक लोहार या तरुणाची भोसकून हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
गुरुवारी शून्य प्रहरात पटोले, शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी हा विषय स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारला.