मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी हातपाय पसरले आहेत. जून जुलै १५ ऑगस्टपर्यंत मलेरिया ३,१७७, डेंग्यू १०७९ तर लेप्टोच्या १८९ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, ५ लाख ६३ हजार ३८२ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ३२ हजार १५८ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
गतवर्षी याच कालावधीत मलेरियाचे २,८५२ रुग्ण होते. यंदा ही संख्या ३,१७७ वर पोहोचली आहे. म्हणजेच वर्षभरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण गतवर्षी ३२२ होते, तर यंदा १८९ आहेत. मात्र, पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्याच्या संपर्कामुळे या आजाराचा धोका कायम असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गतवर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. जून-जुलै-१५ ऑगस्टपर्यंत गतवर्षी १,२१७ रुग्ण होते, तर यंदा १,०७९ रुग्ण नोंदले गेले. मात्र, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. पालिकेने तब्बल ४ लाख ७४ हजार ३४१ उत्पत्तीस्थाने तपासली, त्यापैकी ११,२२७ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळली. याशिवाय छपरांवरून आणि आवारातून ६७४ टायर आणि २५,८६० भंगार वस्तू हटविण्यात आल्या आहेत.
महापालिकेने १ ते १५ ऑगस्टदरम्यान ५ लाख ६३ हजार ३८२ घरांचे सर्वेक्षण केले असून, त्यातून २६ लाख ८५ हजार ८२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत ३२ हजार १५८ रक्तनमुने संकलित करण्यात आले.
नियंत्रणासाठी १७,७९३ ठिकाणांची तपासणी
मलेरिया नियंत्रण पथकाने विहिरी, पाण्याच्या टाक्या, जलतरण तलाव आदी १७,७९३ उत्पत्तीस्थाने तपासली. त्यापैकी ३,३१९ ठिकाणी ॲनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळून आली. त्याचबरोबर १८,५६८ इमारतींच्या परिसरात आणि तब्बल ३ लाख १८ हजार ८०३ झोपड्यांमध्ये धूम्रफवारणी करण्यात आली आहे.