‘जर बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. जेणेकरून मुंबईचा महापौर मराठी होईल’, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, ‘एवढे वाईट दिवस आलेले नाहीत’, असे म्हणत भास्कर जाधव यांच्या वक्तव्याला महत्त्व दिले नाही. एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्याबाबतच्या भूमिकेवर ते म्हणाले की, ‘आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आलेले नाहीत. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही’.
संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवले. आता मोदी, एकनाथ शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेतात का? असा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिले आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात. शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात पक्ष ठेवला. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला. भारतीय जनता पक्षाला सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता’.
आमचा अजेंडा खुर्ची, सत्ता हा नाही - शिंदे
दरम्यान, यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्यांनी २०२२ मध्ये बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा केली आणि जनतेने दिलेल्या कौलाच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले, त्यांच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही. भाजपसोबतची युती ही बाळासाहेब ठाकरे, अटलजी आणि अडवाणीजी यांच्या काळातील जुनी आणि वैचारिक युती आहे. आमचा अजेंडा खुर्ची आणि सत्ता हा नसून मुंबईकरांना काय देणार आहोत हा आहे, असे म्हणत त्यांनी जाधवांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले.