मुंबई : महापौर रितू तावडे यांच्या व्हीआयपी गाडीसमोरील बाजूस लखलखणारे दिवे बसवणे पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. लखलखणारे दिवे बसवा म्हणून प्रशासनाकडे अशी कुठलीही मागणी केलेली नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासनातील ज्या विभागातील अधिकाऱ्याने लखलखणारे दिवे बसवले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे. लाल दिवा, वेणी फणी या शिवाय विरोधकांकडे प्रश्नच नाही, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही, तरी काँग्रेस व उद्धव ठाकरे सेना याबाबत अफवा पसरवतात, असा आरोप महापौर रितू तावडे यांनी केला. मुंबई महापालिका मुख्यालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
११ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पालिका प्रशासनाकडून ज्या गोष्टी उपलब्ध करुन देण्यात आल्या त्या मान्य केल्या असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या की, महापौरांना लाल दिवा आवडतो, असा आरोप केला जात असून याबाबत आपणच पालिका आयुक्तांना जाब विचारला आहे. लखलखणारे दिवे प्रशासनानेच स्वतःहून बसवले असे त्या म्हणाल्या.
यावेळी दाखवत सभागृह नेते गणेश खणकर यांनीही विरोधकांवर टीका केली. माजी सत्ताधारी आताचे विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांनी महापौरांच्या गाडीवर लाल दिवा बसवावा म्हणून मागणी केली होती, याचा व्हिडीओ त्यांनी दाखवला. व्हिडीओ मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून लोकांची कामे होत आहेत. रोज ३०० ते ४०० लोक भेटायला येतात, त्यामुळे महापौर कार्यालयात गर्दी वाढत असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी, असे पत्र आयुक्तांना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईचे फुटपाथ हे पादचाऱ्यांसाठी असून त्यावर बेकायदा पद्धतीने रोहिंगे बांगलादेशी यांनी कब्जा केला आहे. मात्र भाजपची सत्ता येताच मुंबईतील फुटपाथ मोकळे करण्यावर भर दिला असून रोहिंगे बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही खणकर यांनी दिला आहे.
महापौरांचे प्रत्युत्तर
दिवे बसवण्याची मागणी प्रशासनाकडे केली नव्हती
लाल दिवा, वेणीफणी याखेरीज विरोधकांकडे प्रश्नच नाही
गॅस सिलिंडरचा तुटवडा -काँग्रेस व उबाठा पसरवते अफवा