स्वीटी भागवत/मुंबई
मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने यंदाच्या जूनमध्ये आपल्या सेवेची यशस्वी १२ वर्षे पूर्ण केली आहेत. २०१४ मध्ये सुरू झालेली ‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर’ ही मेट्रो लाईन-१ शहरातील सर्वात विश्वसनीय वाहतूक साधनांपैकी एक म्हणून नावारूपास आली आहे. गेल्या १२ वर्षांत, लाईन-१ ने १२५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली असून १५ लाखांहून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार, या कॉरिडॉरवर एकाच दिवसात सर्वाधिक ५.७९ लाख प्रवाशांच्या प्रवासाची नोंद झाली असून, वक्तशीरपणाचा दर ९९.९९% राखण्यात आला आहे. तसेच, सुरुवातीपासून आतापर्यंत एकही प्राणघातक अपघात न झाल्याची नोंद करत ऑपरेटरने सुरक्षिततेचा उत्तम रेकॉर्ड राखला आहे.
एक कॉरिडॉर म्हणून सुरू झालेली लाईन-१ आता निवासी भाग, व्यावसायिक क्षेत्रे आणि इतर वाहतूक केंद्रांना जोडणारा मुंबईतील एक प्रमुख दुवा बनली आहे. मेट्रो स्थानकांचा विकास किरकोळ विक्री (रिटेल) आणि प्रवाशांच्या उत्तम अनुभवासाठीच्या जागा म्हणून करण्यात आला आहे, तर प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी एमएमओपीएलने तंत्रज्ञानावर आधारित अनेक सुधारणा केल्या आहेत.
आपल्या १२ व्या स्थापना दिनानिमित्त एमएमओपीएलने प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. 'एअरटेल पेमेंट्स बँक' च्या भागीदारीत त्यांनी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' प्लॅटफॉर्मवर आधारित सह-ब्रँडेड रूपे 'ऑन-द-गो' कार्डे लाँच केली आहेत. हे ओपन-लूप एनसीएमसी कार्ड मुंबई मेट्रो लाईन-१, लाईन २ए, ७ आणि ३, बेस्ट बसेस आणि आगामी मोनोरेल नेटवर्कवर अखंडित आणि परस्पर प्रवासाची सुविधा देईल.