मुंबईकर ज्या प्रकल्पांची आतुरतेने वाट पाहत होते, त्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांना अचानक ब्रेक लागला आहे. मेट्रो मार्ग ९ आणि २बीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, बीकेसी पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. यापूर्वी, २८ मार्च रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हे चार महत्त्वाचे प्रकल्प ३ एप्रिल रोजी सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.
विलंबाचं नेमकं कारण काय?
या विलंबाबाबत एमएमआरडीएकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार हे कार्यक्रम आता ५ किंवा ६ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या निवडणूक होणाऱ्या राज्यांमधील वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय बैठका असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाचे प्रकल्प का आहेत?
मेट्रो मार्ग ९ आणि २बीच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची नागरिकांना मोठी प्रतीक्षा होती. हे मार्ग पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून, निवासी आणि व्यावसायिक भागांना जोडणारे प्रमुख दुवे ठरणार आहेत.
दोन दिवसांपूर्वीच एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी दोन्ही मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करत सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता.
पॉड टॅक्सी प्रकल्पाची खासीयत
बीकेसी परिसरात प्रस्तावित पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही याच दिवशी होणार होतं. हा प्रकल्प अत्याधुनिक, चालकविरहित वाहतूक प्रणाली आणण्याचा प्रयत्न असून, मुंबईतील सर्वाधिक व्यस्त व्यावसायिक भागातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्याचा उद्देश आहे.
ठाणे-बोरिवली बोगद्यामुळे काय फायदा?
३ एप्रिलपासून ठाणे-बोरिवली बोगद्याच्या खोदकामालाही सुरुवात होणार होती. हा बोगदा सुरू झाल्यानंतर ठाणे आणि बोरीवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.