मुंबई

MMRC चा मोठा निर्णय; सोमवारपासून Aqua Line मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा

मुंबई मेट्रो लाईन ३ (Aqua Line) वर सोमवारपासून अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार असून, MMRC च्या निर्णयामुळे उत्तर-दक्षिण मुंबईतील प्रवाशांना आणि वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. Mumbai Metro Rail Corporation (MMRC) ने जाहीर केले की, मुंबई मेट्रो ३ (Aqua Line) वर सोमवार (दि.५) पासून अतिरिक्त मेट्रो फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

MMRC च्या माहितीनुसार, सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोजच्या फेऱ्या २६५ वरून २९२ करण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि.३) मेट्रोच्या फेऱ्या २०९ वरून २३६ इतक्या वाढवण्यात आल्या असून, रविवारच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही. रविवारी (दि.४) नेहमीप्रमाणे १९८ फेऱ्या सुरू राहणार आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन MMRC कडून करण्यात आले आहे.

उत्तर-दक्षिण मुंबईला भूमिगत जोड

३३.५ किलोमीटर लांबीची ही संपूर्ण भूमिगत मेट्रो लाईन आरे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) येथून सुरू होऊन बांद्रा-कुर्ला संकुल (BKC) मार्गे कफ परेड पर्यंत जाते. या मार्गावर एकूण २७ स्थानके असून, आरे JVLR वगळता सर्व स्थानके भूमिगत आहेत.

पहिली मेट्रो सकाळी ५.५५ वाजता, तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता धावते. उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या भूमिगत मेट्रो मार्गामुळे रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.

सोमवारपासून Aqua Line मेट्रोच्या फेऱ्या वाढणार

प्रवासी संख्येत सातत्याने वाढ

ऑक्टोबर महिन्यात मेट्रो लाईन ३ ने ३८.६३ लाख प्रवाशांची नोंद केली असून, दररोज सरासरी १,४१,०२४ प्रवासी या मेट्रोचा वापर करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरातील वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. JJ फ्लायओव्हर, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग आणि डी.एन. रोड या मार्गांवरील गर्दीत लक्षणीय घट झाल्याचेही आढळून आले आहे.

टप्प्याटप्प्याने सुरू झालेली मेट्रो लाईन ३

मेट्रो लाईन ३ चा पहिला टप्पा आरे ते BKC दरम्यान २०२४ मध्ये सुरू झाला. त्यानंतर मे २०२५ मध्ये BKC ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा दुसरा टप्पा खुला करण्यात आला. अंतिम टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला, तर ९ ऑक्टोबर २०२५ पासून संपूर्ण मार्गावर व्यावसायिक सेवा सुरू झाली.

अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, मुंबईतील दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.

BMC Budget 2026 : करवाढ नसलेला अर्थसंकल्प; महापालिकेचा ८० हजार ९५२.५६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

घेरण्याकरिता विरोधी पक्षनेतेपदच का हवे?

आजचे राशिभविष्य, २६ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पोट, त्वचा आणि हृदयासाठी उपयुक्त; कोथिंबीर खाल्ल्याने कोणते फायदे होतात?

Marathi Bhasha Din : २७ फेब्रुवारीलाच का साजरा करतात मराठी भाषा दिन? जाणून घ्या कारण