मुंबई : मुंबईकरांसाठी नवी लाईफलाइन ठरलेल्या मुंबई मेट्रो मार्ग-४ (वडाळा ते कासारवडवली) प्रकल्पातील दहा स्थानकांच्या कामासाठी पुढील १५ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने ३ नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रकल्पाचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ रोजी जनतेसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शनिवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा भार कमी करणाऱ्या आणि मुंबई-ठाण्याच्या प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मेट्रो-४ च्या वडाळा ते कासारवडवली मार्गाच्या सहा उन्नत स्थानकांच्या कामासाठी गेल्यावर्षी निविदा मागविण्यात आल्या. परंतु, त्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याबद्दल भाजपच्या अॅड. निरंजन डावखरे यांनी प्रश्न विचारला होता.
यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मिसाळ म्हणाल्या, ३२.३२ कि.मी. लांबीच्या या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत केली जात असू असून एकूण ३२ स्थानकांपैकी २० स्थानकांची कामं यापूर्वीच पूर्ण झाली आहेत. या मार्गावरील गांधीनगर स्थानक 'आयकॉनिक' स्वरूपात विकसित करण्याचा निर्णय घेतल्याने डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. त्यासंदर्भात सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दरम्यान, मेट्रो कारशेडसाठी जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला दिला जात आहे. तसेच यासंदर्भात सदस्यांकडून आणखी सूचना असल्यास स्वतंत्र बैठक घेऊन त्यावर विचार केला जाईल, असेही मिसाळ यांनी नमूद केले.
पुढचे टप्पे
उर्वरित काम पाच पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. त्यासंदर्भातील स्वतंत्र निविदा काढण्याची कार्यवाही सुरू असून पुढील १५ दिवसांत निविदा प्रसिद्ध केल्या जातील. या मेट्रो योजनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पर्यत जनतेसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, तर दुसरा टप्पा २ डिसेंबर २०२६ पर्यंत आणि तिसरा टप्पा ३ नोव्हेंबर २०२७पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.