मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा  
मुंबई

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा

वरुणराजाच्या आगमनास तीन महिने शिल्लक असताना मुंबई महापालिका पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाच्या मोसमात वरुणराजा जोरदार बॅटिंग करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत २४ दिवस समुद्राला मोठी भरती आहे.

Swapnil S

मुंबई : वरुणराजाच्या आगमनास तीन महिने शिल्लक असताना मुंबई महापालिका पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाच्या मोसमात वरुणराजा जोरदार बॅटिंग करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत २४ दिवस समुद्राला मोठी भरती आहे. यापैकी जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वाधिक मोठी भरती येणार असून यामध्ये १६ जुलैला ४.८९ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खबरदारी घ्यावी लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात पाणी साचते आणि मुंबईची तुंबई होते. यंदाही समाधानकारक पाऊस बरसणार असून पाऊस आणि समुद्राला भरती अशा वेळी मुंबई जलमय होण्याचा धोका निर्माण होतो.

या भरतीवेळी समुद्राच्या लाटा ४.५० मीटर उंचीपेक्षाही जास्त उसळतात. पावसाचे पाणी समुद्रात सोडण्याचे पंपिग स्टेशनचे दरवाजे, सांडपाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लड गेट्स बंद ठेवण्यात येतात. परिणामी सखल भागात पाणी साचते. यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान २४ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. यामध्ये जूनमध्ये सहा दिवस मोठया भरतीचे असून सर्वाधिक भरती ही १६ आणि १७ जूनला असेल. त्या दिवशी अनुक्रमे दुपारी १.०५ वाजता ४.८७ मीटर आणि दुपारी १.५५ वाजता ४.८६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जुलैमध्ये सहा दिवस मोठया भरतीचे आहेत. त्यापैकी १५ जुलैला दुपारी १२.५१ वाजता ४.८५ मीटर आणि १६ जुलैला दुपारी १.३६ वाजता ४.८९ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. ऑगस्टमध्ये पाच दिवस मोठया भरतीचे असून यामध्ये १४ ऑगस्टला दुपारी १.०७ मिनिटांनी ४.८३ मिटर उंचीच्या लाटा आणि सप्टेंबरमध्ये सात दिवस मोठ्या भरतीपैकी सर्वाधिक मोठी भरती ११ सप्टेंबरला असेल. त्या दिवशी दुपारी बारा वाजता ४.६५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती महापालिककेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब