मुंबई : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी मुंबईतील विविध केंद्रांवर सुरळीत पार पडली. मात्र परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालय परीक्षा केंद्रावर काही मिनिटे उशिरा पोहोचलेल्या दोन विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यावे, यासाठी येथे काही वेळ पालकांनी गोंधळ घातला, तर या परीक्षेत भौतिकशास्त्र पेपर कठीण असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.
देशभरात नीट परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट होताच ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर रविवारी फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील सुमारे ६३ केंद्रांवर ही परीक्षा रविवारी पार पडली. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दीड वाजेपर्यंत संबंधित केंद्रांवर पोहोचावे, अशा सूचना एनटीएकडून देण्यात आल्या होत्या. दीड वाजेनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याची सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.
मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनांनी रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला तसेच बेस्ट प्रशासनानेही कर्मचाऱ्यांचा संप असतानाही ६० बसगाड्या २४ मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेतला. या ६० गाड्यांशिवाय बेस्ट प्रशासनाने एसटी प्रशासनाकडे १०० गाड्यांची मागणीही केली होती. या गाड्या कुर्ला, दादर, मालाड, मुलुंड आदी ठिकाणांसह इतरही परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यासाठी चालवल्या गेल्या.