मुंबई : मुंबई व परिसरात पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नसून धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तानसा धरणात ७२, मोडक सागर ६८ तर मध्य वैतरणात ७२ मिमी पावसाची नोंद झाली असून सातही धरणांत ४ जुलैला पाणीसाठा १० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
मुंबई व परिसरात वरुणराजाची २७ जूनपासून एंट्री झाली. गेल्या सात दिवसांपासून मुंबई व परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू झालेली नाही. मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते.
सध्या सातही धरणांत ४ जुलैला १ लाख ३६ हजार १३७दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने १५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने पाणी कपातीत आणखी वाढ करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून धरण क्षेत्रात पावसाची संथगतीने कूच सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत किंचित वाढ होत असल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)
अप्पर वैतरणा ४०.०० मिमी
मोडकसागर ६८.०० मिमी (शनिवार दुपारी ३ पर्यंतची नोंद)
तानसा ७२ मिमी (शनिवार दुपारी ३ पर्यंतची नोंद)
मध्य वैतरणा - ७२ मिमी (शनिवार दुपारी ३ पर्यंतची नोंद)
भातसा - ७२.०० मिमी
विहार - १२२.०० मिमी
तुळशी - १५० मिमी